कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात कोल्हापूर जिल्हा अग्रगण्य ठरला आहे. जिल्ह्यात तब्बल ४५ नागरी सहकारी बँका कार्यरत असून त्यापैकी २९ बँकांचा निव्वळ एनपीए शून्य टक्के आहे. यावरून या बँकांची आर्थिक सक्षमता स्पष्ट होते.
मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०२४-२५ मध्ये ठेवीत तब्बल ९१८ कोटींची वाढ झाली आहे. कर्जवाटपात ३५९ कोटींची वाढ झाली असली तरी वसुलीचे प्रमाण लक्षणीय चांगले आहे.
सहकाराची पंढरी : कोल्हापूर
कोल्हापुरात बँका, पतसंस्था, साखर कारखाने, विकास संस्था, दूध संस्थांचे जाळे विणले गेले आहे. राज्याच्या तुलनेत येथेच खऱ्या अर्थाने सहकार रुजला आणि बहरला आहे. त्यामुळे कोल्हापूरला ‘सहकार पंढरी’ अशी ओळख मिळाली आहे.
फक्त संस्थांची संख्या जास्त नाही, तर त्यांचा विकासदरही नेत्रदीपक आहे. येथे ४१ नागरी सहकारी बँका, १३७२ नागरी-ग्रामीण पतसंस्था, ३५० पगारदारांच्या पतसंस्था आणि १ जिल्हा मध्यवर्ती बँक अशा १७६८ वित्तीय संस्था कार्यरत आहेत.
स्पर्धेमुळे शिस्तबद्ध कारभार
जिल्ह्यात बँकांची संख्या जास्त असल्याने तीव्र स्पर्धा आहे. त्यामुळे कारभार चुकला तर ग्राहक बाजूला जाण्याची भीती व्यवस्थापनाला असते. त्याचबरोबर स्थानिक राजकारणही बँकांवर अवलंबून असल्याने नैतिक दबाव कायम राहतो. परिणामी बँका अधिक शिस्तबद्ध पद्धतीने काम करतात.
पश्चिम महाराष्ट्रातील वित्तीय संस्था
कोल्हापूर : १ जिल्हा बँक, ४५ नागरी बँका, १३७२ पतसंस्था, ३५० पगारदारांच्या पतसंस्था – एकूण १७६४
सांगली : १ जिल्हा बँक, २० नागरी बँका, १०२६ पतसंस्था, १८० पगारदारांच्या पतसंस्था – एकूण १२२७
सातारा : १ जिल्हा बँक, २२ नागरी बँका, ६४७ पतसंस्था, २११ पगारदारांच्या पतसंस्था – एकूण ८८१
बँकिंग तज्ज्ञांचे मत
“कोल्हापुरातील बँकांचे विश्वस्त मंडळ, सभासद आणि ग्राहकांचे कौतुक केले पाहिजे. सुरुवातीपासूनच त्यांनी आर्थिक शिस्त लावून घेतली आहे. यामुळे नागरी सहकारी बँका अधिक ताकदीने काम करत आहेत.”
– अनिल नागराळे, बँकिंग तज्ज्ञ